ताण व्यवस्थापन, विज्ञान आणि अध्यात्म

आजची परिस्थितीच अशी आहे की, अगदी शाळेत जाणारी लहान मुलं असोत, तरूण असोत, किंवा ज्येष्ठ नागरिक, सर्वांनाच कोणत्या ना कोणत्या मानसिक ताणाला सामोरं जावं लागतं. मुलांना आधी शाळेत अथवा महाविद्यालयात प्रवेश मिळेल की नाही, याचा ताण, मग गुणांच्या स्पर्धेचा ताण. शिक्षण आणि या ताणाने हिरावून घेतलेलं बालपण संपतंय म्हणेपर्यंत ऐन तारूण्यात आधी नोकरी-व्यवसाय मिळण्यासाठीचा ताण, मग त्यातल्या कामाचा ताण आणि नंतर त्यात प्रगती किंवा बढती कशी होईल याचा ताण.  या नोकरी-व्यवसायात स्थिरावून संसाराला सुरुवात करायची तर आयुष्याचा जोडीदार कसा मिळेल याचा ताण आणि त्यानंतर ऑफिसच्या आणि घरच्या जबाबदाऱ्या सांभाळण्याची कसरत करतानाच घरातली नाती सांभाळताना येणारा ताण. आयुष्यभर ताणाखाली घालवल्यामुळे मागे लागलेल्या डायबिटीस, ब्लडप्रेशर आणि इतर आजारांमुळे किंवा वयोमानामुळे कमी होत चाललेल्या शक्तीमुळे दिवसेंदिवस परावलंबी तर होणार नाही ना, आपला जोडीदार आपल्या आधी गेला तर येणाऱ्या एकटेपणात आपलं कसं होईल, आयुष्यभराची पुंजी अखेरपर्यंत पुरेल की नाही, अशा एक ना अनेक विवंचनांमुळे येणारा ताण. थोडक्यात काय, तर संपूर्ण आयुष्यच आपण कोणत्या ना कोणत्या ताणाखाली घालवत असतो.

आयुष्याची व्याख्या:

या सगळ्याचा विचार केल्यावर मनात येतं की, ज्यामुळे ताण येतो अशा याआधी उल्लेखलेल्या सर्व समस्या लक्षात घेतल्यात, तर आयुष्याची व्याख्या  "महासमस्या" अशी एका शब्दात करता येईल. हे कदाचित थोडसं नकारात्मक वाटेल. पण बघा ना आयुष्यातली पहिली समस्या असते की, जन्माला आल्याआल्या बाळाला श्वास घेता येत नाही. तेव्हा डॉक्टर बाळाच्या पाठीवर थापट्या मारतात आणि मग रडता रडता बाळ श्वास घ्यायला शिकतं, तर आयुष्यातली शेवटची समस्या असते ती ही की, आता हे जर्जरआयुष्य नकोसं झालंय, पण श्वास थांबत नाही. या दोन श्वासांमधलं अंतर असलेलं आयुष्य म्हणजे याआधी आपण पाहिलेल्या अनंत समस्यांची मालिका असलेली महासमस्या! आपण जी महान व्यक्तिमत्त्वं जगात बघतो, ती महान का असतात, तर या महासमस्येवर म्हणजेच आयुष्यात समोर येणाऱ्या प्रत्येक समस्येवर या व्यक्ती निकराने, धीराने आणि जिद्दीने मात करून आयुष्यात खूप काही मिळवतात, त्यांच्या-त्यांच्या क्षेत्रात उंची गाठतात. वाळवंटात ओएसिस शोधावं, तसं या व्यक्ती इतक्या समस्या असूनही आयुष्यातलं सौंदर्य शोधून त्यातल्या नकारात्मकतेला सकारात्मकतेत परावर्तीत करतात. अशा व्यक्तींची सकारात्मकता इतकी असते की, आयुष्यातल्या समस्यांकडे अधिक लक्ष देणाऱ्या आपल्यासारख्या सर्वसामान्यांनाही त्यांच्याशी बोलल्यानंतर, त्यांच्याबरोबर वावरल्यानंतर आशेची नवी दिशा मिळाल्यामुळे नकारात्मकतेचं, निराशेचं मळभ दूर व्हायला मदत होते, मनाला उभारी मिळते.

विज्ञानाचे नियम:

आता आपण सगळेच काही अशा महान व्यक्ती होऊ शकत नाही. त्यामुळे उगाचच कसल्याशा मोठ्ठ्या आशा ठेवून काहीच जमलं नाही, की पुन्हा आपली वाटचाल नकारात्मकतेकडे, नैराश्याकडे सुरू होते. मग काय करायचं? यावर एक करून बघता येईल. वैज्ञानिक सिद्धांताचा उपयोग आपण आयुष्यातले ताण कमी करण्यासाठी करू शकतो का, ते पाहूया.

वैज्ञानिक सिद्धांतांनुसार अवकाशातल्या पदार्थांवर बाहेरून कार्य करणाऱ्या बलामुळे पदार्थात "स्ट्रेस" अर्थात ताण निर्माण होतो. म्हणजे समजा पदार्थ म्हणजे आपलं मन आहे, तर बाहेरून कार्य करणारं बल म्हणजे आयुष्यातल्या स्पर्धा, अनिश्चितता, संकटं, वगैरे, वगैरे... आणि त्यामुळे आपल्या मनावर ताण येतो. मग कोणत्या पदार्थांमध्ये ताण कमी किंवा जास्त असतो? "Rigid" म्हणजेच कठीण पदार्थांमध्ये ताण जास्त, तर "Flexible" म्हणजेच लवचिक पदार्थांमध्ये ताण कमी येतो. त्यामुळेच आयुष्य जगताना जी माणसं अधिक लवचिकपणा दाखवतात, तडजोड करायची तयारी ठेवतात, अशा माणसांना आयुष्य आहे तसं स्वीकारायची तयारी असल्यामुळे कमी ताण येतो. अडेलतट्टू माणसं प्रत्येकाबरोबर वादावादी करून किंवा त्यांच्या हट्टीपणापायी केवळ आपल्याच नाही, तर इतरांच्याही आयुष्यात ताण निर्माण करतात. बऱ्याचवेळा आयुष्यातले बदल सहजतेनं न स्वीकारल्यामुळेही ताण निर्माण होतो. पण बदल हा आयुष्याचा अविभाज्य भाग आहे, हे आपण विसरतो. पण आपली बदल न स्वीकारायची वृत्तीही नैसर्गिक आहे. आपण शाळेत शिकलेला न्युटनच्या गतीच्या पहिला नियम आपल्यालाही लागू पडतो. या नियमानुसार जोपर्यंत कोणत्याही पदार्थावर बाह्य बल कार्य करत नाही, तोपर्यंत स्थिर असलेला पदार्थ गती धारण करत नाही किंवा गतीत असलेला पदार्थ स्थिर होत नाही. याचं उदाहरण म्हणजे सहजासहजी आपल्याला आपल्या स्थिरावलेल्या नोकरी-व्यवसायात किंवा आरामदायी आयुष्यातल्या कोणत्याही सद्यस्थितीत बदल नको असतो. जेव्हा वर उल्लेखलेल्या बाह्य गोष्टींमुळे नाईलाज होतो, तेव्हाच आपण मनाविरूद्ध बदल स्वीकारतो आणि मग त्यातून ताण निर्माण होतो. काळ हा अनेक गोष्टींवरचं औषध असतो. आपल्याला ज्या गोष्टीमुळे आधी खूप दु:ख होऊन मनावर ताण येतो, त्याच गोष्टींचं कालांतराने आपल्याला वाटणारं दु:ख कमी होऊन ताणही कमी होतो. म्हणूनच तर न्युटनच्याही पुढे जाऊन सापेक्षतावादाचा सिद्धांत मांडणाऱ्या आइनस्टाइनने त्याच्या सिद्धांतात काळाचाही विचार केला आहे.

अध्यात्मातली शिकवण:

याप्रमाणेच आपल्याला अपेक्षित असलेले सुखाचे बदल अथवा नको असलेले दु:खाचे बदल आपल्या आयुष्यात झाले की, मनाविरूद्ध झाल्यामुळे आपल्या मनावर ताण येतो. श्रीकृष्णानेही अर्जुनाला भगवद्गीतेत दुसऱ्या अध्यायातल्या 14 व्या श्लोकात हेच सांगितलं आहे.

मात्रा स्पर्शास्तु कौंतेय शीतोष्णसुखदु:खद:।

आगमापायिनोऽनित्यास्तांस्तितीक्षस्व भारत।।

हे कुंतीपुत्रा,  विषयांमुळे इंद्रियांच्या उपभोगातून निर्माण होणारे आनंद आणि दु:ख हे नियमितपणे येत-जात राहणाऱ्या उन्हाळा आणि हिवाळ्यासारखे आहेत. हे ऋतु ज्याप्रमाणे आपलं मन फारसं विचलित न होता आपण सहन करतो, तसंच तू या येत-जात राहणाऱ्या सुख-दु:खाकडे विचलित न होता बघ.

या श्लोकाचा अर्थ थोडासा कठीण वाटला, तरी न्युटन आणि आइनस्टाइनने जे सांगितलं तेच खूप आधी श्रीकृष्णानेही सांगितलंय. काळानुसार सुख-दु:ख येत-जात असतात, तेव्हा त्यांच्याकडे तटस्थपणे बघायची सवय मनाला लावली, तर मनाची "Rigidity" कमी झाली की, या सुख-दु:खरूपी बलांमुळे मनरूपी पदार्थात निर्माण होणारा ताण कमी व्हायला मदत होईल.

अगदी थोडक्यात सांगायचं तर आनंदी आयुष्यासाठीचे नियम, विज्ञानातल्या सिद्धातांचे नियम आणि अध्यात्मात प्रगती करण्यासाठीचे नियम यात बरंच साम्य असल्याचं आपल्याला पुन्हा एकदा दिसून येतं. म्हणूनच आयुष्यातले अनेक गुंते, समस्या सोडवण्यासाठी आणि त्यातून येणारा ताण कमी करण्यासाठी आपल्याला विज्ञान आणि अध्यात्माचा उपयोग होऊ शकतो.

 

Comments

  1. Nice correlation between laws of science and dealing with stress management

    ReplyDelete
  2. वा! मनोज,
    विज्ञान आणि अध्यात्म, विज्ञान आणि त्यातीलच एक शाखा - मानसशास्त्र यांचा सुरेख मेळ या लेखात घातला आहेस! खूप छान झालाय लेख! अभिनंदन!!!🌹🌿
    राधिका कुलकर्णी.

    ReplyDelete
  3. वा! मनोज,
    विज्ञान आणि अध्यात्म, विज्ञान आणि त्यातीलच एक शाखा - मानसशास्त्र यांचा सुरेख मेळ या लेखात घातला आहेस! खूप छान झालाय लेख! अभिनंदन!!!🌹🌿
    राधिका कुलकर्णी.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

Stress Management, Science and Spirituality

अध्यात्म,आयुष्य आणि विज्ञान